राज्य मंडळाचा इयत्ता पहिली ते नववीच्या निकाल प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल, उत्तरपत्रिका दाखवणे बंधनकारक
राज्यात उन्हाळी सुट्ट्या यंदा २ मे पासून लागणार असून १ मे रोजी इयत्ता पाहिली ते इयत्ता नववीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्य मंडळाने निकाल प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले असून पहिल्यांदाच इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांचा पालकांना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका दाखवणे शिक्षकांसाठी बंधनकारक केले आहे.
शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका व्यवस्थित आणि बारकाईने तपासावी लागणार आहे. या संदर्भात शिक्षण आयुक्तांनी आदेश जारी केले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, विद्यार्थ्यांचा विकास होणे आणि त्यांची वैशिष्ट्यपूर्ण क्षमता ओळखणे आवश्यक आहे त्यानुसार, निकालाच्या दिवशी निकाल येताना त्यांच्या उत्तरपत्रिका दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेणे करून अचूक मूल्यांकन करता येईल. तसेच पालकांच्या मदतीने विद्यार्थ्यांची अध्ययनातील गरज ओळखून योग्य उपाययोजना करता येऊ शकेल. या निर्णयामुळे पालकांची जबाबदारीही वाढणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत पालक अधिक सजग व जबाबदार बनतील.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या सवयी जसे वाचन, लेखन आणि वेळेचे नियोजन विकसित करण्यासाठी पालक सक्रिय सहभाग घेतील. शाळा आणि घर यांच्यात समन्वय वाढून सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण होईल.या उद्देशानेच राज्य मंडळाच्या सर्व शाळांनी १ मे रोजी निकालावेळी पालकांना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका दाखवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
Edited By - Priya Dixit