1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
  4. Complete information about Avidhwa Navami Shraddha

आई नवमी श्राद्ध: अविधवा नवमी श्राद्धाची संपूर्ण माहिती

Aae--Navami
अविधवा नवमी म्हणजे मातृ नवमी किंवा आई नवमी होय. ही पितृपक्षातील एक महत्त्वाची तिथी आहे. हिंदू धर्मात पितृपक्षादरम्यान आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. यापैकी नवमी तिथीला अविधवा नवमी म्हणून साजरी केली जाते, जी विशेषत: सौभाग्यवती म्हणजेच पती जिवंत असताना मृत्यू झालेल्या महिलांच्या श्राद्धासाठी समर्पित आहे. ही तिथी माता, सासू, सुना किंवा कुटुंबातील इतर विवाहित महिलांच्या आत्म्याच्या शांतीसाठी महत्त्वाची मानली जाते.

अविधवा नवमी म्हणजे काय?
अविधवा म्हणजे जी स्त्री विधवा नसते, जिचा पती जिवंत असताना तिचा मृत्यू झाला आहे. अशा सौभाग्यवती महिलेची मरणोत्तर गणना ‘सधवा’ म्हणून केली जाते. या दिवशी अशा महिलांचे श्राद्ध केले जाते ज्यांचा मृत्यू त्यांच्या पतीच्या मृत्यूपूर्वी झाला आहे. या श्राद्धामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि कुटुंबाला सुख-समृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो. अविधवा नवमीचे श्राद्ध केल्याने पितृदोष दूर होतो, कुटुंबात सौभाग्य आणि समृद्धी येते. तसेच, मृत महिलेच्या अपूर्ण इच्छा आणि कुटुंबाबद्दलच्या काळजी मिटवण्यासाठी हा विधी केला जातो, ज्यामुळे तिचा आत्मा तृप्त होतो.
कोणाचे श्राद्ध करावे?
सौभाग्यवती महिलांचे श्राद्ध म्हणजेच ज्या माता, सासू, सुना, मुली किंवा कुटुंबातील इतर विवाहित महिलांचा मृत्यू त्यांच्या पती जिवंत असताना झाला आहे, त्यांचे श्राद्ध या दिवशी केले जाते. जर सावत्र आई जिवंत असेल आणि सख्खी आईचे निधन झाले असेल, तर मुलाने हे श्राद्ध करावे. सख्खी आई जिवंत असेल आणि सावत्र आईचे निधन झाले असेल, तरीही मुलाने हे श्राद्ध करावे. जर मृत महिलेला मुलगा नसेल किंवा मुलाचाही मृत्यू झाला असेल, तर त्या महिलेच्या मुलांनी म्हणजेच नातवंडांनी हे श्राद्ध करू नये.

विधवा महिलांचे श्राद्ध या तिथीला केले जात नाही.
मृत्यू तिथी अज्ञात असल्यास: जर मृत्यूची तारीख माहीत नसेल आणि पती जिवंत असेल, तर अविधवा नवमीला त्या महिलेचे श्राद्ध केले जाऊ शकते.

अविधवा नवमी श्राद्धाची पद्धत
अविधवा नवमीचे श्राद्ध पार्वण विधीने केले जाते. सर्वात आधी सकाळी स्वच्छ स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. घराच्या दक्षिण दिशेला स्वच्छ जागा निवडून हिरवे कापड पसरावे.

तर्पण आणि पिंडदान-
तीळ, जौ आणि तांदूळ यापासून पिंड बनवून पितरांना अर्पण करावे. पाण्यात तीळ आणि मिश्री मिसळून तर्पण करावे. तसेच, तुळशीच्या पानांचा समावेश करावा.

नैवेद्य आणि भोजन-
मृत व्यक्तीच्या आवडीचे पदार्थ बनवावेत. लौकीची खीर, पालक, मूंगदाळ, पूडी, हिरवी फळे, लवंग-इलायची आणि मिश्री अर्पण करावी. एखाद्या सुवासिनीला (विवाहित स्त्री) जेवण द्यावे आणि तिला यथाशक्ती साडी, बांगड्या, गजरा, सर्व श्रुंगार पेटी म्हणजेच मेहंदी कोन, जोडवे, टिकली पाकीट, दक्षणा अन्य भेटवस्तू दान करावी.व खणानारळाने ओटी भरावी,

मंत्र आणि पूजा-
कुशाच्या आसनावर बसून भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायाचे पाठन करावे.‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ किंवा ‘ओम धत्रये नमः’ या मंत्रांचा 108 वेळा जप करावा.

काकबली-
मृत महिलेच्या नावाने काकबली वाढून नैवेद्य दाखवावा.
अविधवा नवमीचे महत्त्व-
या दिवशी ब्रह्मांडात रजोगुणी शिवतरंगांची अधिकता असते, ज्यामुळे मृत सौभाग्यवती महिलेच्या आत्म्याला सूक्ष्म शिवशक्तीचा लाभ मिळतो. यामुळे तिच्या आत्म्याची उर्ध्वगती साधली जाते. या श्राद्धामुळे कुटुंबातील संकटे दूर होतात आणि सुख-समृद्धी वाढते. अविधवा नवमी ही मृत महिलेच्या कुटुंबासाठी केलेल्या त्याग आणि काळजीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे. यामुळे तिच्या आत्म्याला शांती मिळते आणि कुटुंबाला आशीर्वाद प्राप्त होतो. विशेषत: गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात हा विधी मोठ्या श्रद्धेने पाळला जातो.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
Somwar Aarti सोमवारची आरती