महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट तर पुणे घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी
महाराष्ट्रामध्ये मुंबई, कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने २१ ते २६ जुलै दरम्यान कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
तसेच महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागानुसार गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा आणि चक्रीय हवामान प्रणाली निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात मान्सून पुन्हा जोरदार सक्रिय झाला असून पुढील ४ ते ५ दिवस विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकण आणि मुंबई परिसर
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये पुढील २४ ते ४८ तास मुसळधार पावसाचे असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरात अत्यंत तीव्र आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच बुधवार, २२ जुलै रोजी पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार ते अत्यंत तीव्र पावसाचा (अतिवृष्टी) रेड अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भ
पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट असेल. तसेच नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्र
नाशिक (घाट भाग), जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Edited By- Dhanashri Naik
