1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. By accepting Supriya Sule's demand, Jitendra Awhad took a big decision

सुप्रिया सुळेंची मागणी मान्य करुन जितेंद्र आव्हाडांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

By accepting Supriya Sule
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी ग्रामीण भागातून मुंबईत येणाऱ्या महिलांना व तरुणींना राहण्यासाठी जागा नसल्याने अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे अशा महिलांना राहण्याची सोय करावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली होती. सुप्रिया सुळे यांनी मागणी केल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी  मोठा निर्णय घेऊन घोषणा केली आहे. त्यामुळे नोकरीनिमित्त ग्रामीण भागातून मुंबईत येणाऱ्या महिला व तरुणींना लवकरच म्हाडाचं छत्र मिळणार आहे.
 
देशभरातून मुंबईतील टाटा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी जशी व्यवस्था केली. तशीच व्यवस्था ग्रामीण भागातून मुंबईत नोकरीसाठी येणाऱ्या महिला व तरुणींसाठी करण्यात यावी, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्यासाठी एखादं वसतिगृह उभारण्यात यावं, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. या संदर्भात त्यांनी 10 एप्रिल रोजी ट्विट केले होते. सुप्रिया सुळे यांच्या मागणीची जितेंद्र आव्हाड यांनी तात्काळ दखल घेतली आहे.
 
 
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक महिला, तरुणी कामासाठी येत असतात. सुरुवातीच्या संघर्षाच्या काळामध्ये त्यांना राहण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु आता महिलांच्या संघर्षाच्या काळात कष्टकरी महिलांना म्हाडा साथ देणार आहे, असे नमूद करत जितेंद्र आव्हाड म्हणाले, वर्किंग वूमनसाठी दक्षिण मुंबईत ताडदेव येथे वसतिगृह बांधण्यात येणार आहे. यामध्ये 500 खोल्या उपलब्ध केल्या जाणार आहेत. एका खोलीत दोन महिला याप्रमाणे एक हजार महिलांची राहण्याची सोय करण्यात येणार आहे. पुढच्या दोन वर्षामध्ये वसतिगृहाची ही इमारत बांधून तयार होईल, अशी माहिती आव्हाड यांनी दिली. काबाड कष्ट करुन आपल्या संसाराचे पोट भरणाऱ्या, प्रतिकूल परिस्थिती असतानाही जिद्दीने ज्ञानार्जन करणाऱ्या महिला व तरुणींना या वसतिगृहात प्राधान्य दिले जाणार असल्याचेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.
पुढील लेख
कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करताना गरजूंच्या पाठिशी, कुणाचीही आबाळ होऊ देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे