Majha Maharashtra Nibandh Marathi महाराष्ट्राची संस्कृती
सह्याद्रीच्या रांगा, संतांची परंपरा आणि पराक्रमी इतिहासाने नटलेला महाराष्ट्र आपली एक वेगळी संस्कृती जपून आहे. 'बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा' या ओळी महाराष्ट्राच्या वैभवाचे दर्शन घडवतात. महाराष्ट्राची संस्कृती ही अत्यंत प्राचीन, समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहे. 'राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा' असे जिचे वर्णन केले जाते, त्या महाराष्ट्राने कलेपासून साहित्यापर्यंत आणि शौर्यापासून भक्तीपर्यंत सर्वच क्षेत्रांत आपला ठसा उमटवला आहे.
तसेच महाराष्ट्राच्या संस्कृतीचा पाया संतांनी रचला आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत नामदेवांनी समाजाला 'माणुसकी' आणि 'भक्ती' शिकवली. याच भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य हा महाराष्ट्राचा अभिमान आहे. सह्याद्रीच्या कुशीत असलेले रायगड, शिवनेरी, प्रतापगड यांसारखे किल्ले केवळ दगडधोंड्यांच्या भिंती नसून ते महाराष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक आहे. शौर्य आणि अध्यात्म यांचा हा सुंदर मिलाफ महाराष्ट्राच्या कणाकणात वसलेला आहे. तर 'अतिथी देवो भव' ही महाराष्ट्राची वृत्ती आहे. मराठी भाषा आणि इथली माती प्रत्येकाला सामावून घेते. आजच्या आधुनिक युगातही महाराष्ट्राने आपली जुनी परंपरा आणि संस्कृती जपून ठेवली आहे, हीच या राज्याची सर्वात मोठी ताकद आहे. तसेच महाराष्ट्रात मराठी खाद्यपदार्थांची चव निराळीच आहे. पुरणपोळी, झुणका-भाकर, मिसळ-पाव आणि वडापाव हे पदार्थ केवळ खाद्यपदार्थ नसून ती महाराष्ट्राची ओळख बनली आहे. सणासुदीला होणारा पुरणपोळीचा स्वयंपाक घरोघरी आनंदाची उधळण करतो.
तसेच महाराष्ट्रातील सण अत्यंत उत्साहाने साजरे केले जातात. गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सार्वजनिक उत्सव आहे. तर दिवाळी आणि दसरा हे सीमोल्लंघन आणि आनंदाचा सण म्हणून ओळखले जातात. तसेच गुढीपाडवा दिवशी मराठी नूतन वर्षाची सुरुवात गुढी उभारून केली जाते. तर आषाढी वारीला पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकतेचे सर्वात मोठे प्रतीक आहे. 'विठ्ठल' हे महाराष्ट्राचे लाडके दैवत आहे.
कला आणि लोकसंस्कृती
महाराष्ट्राची कला जागतिक स्तरावर ओळखली जाते.
लावणी: ढोलकीच्या तालावर सादर केली जाणारी लावणी महाराष्ट्राची शान आहे.
पोवाडा: वीरांच्या गाथा सांगणारा पोवाडा आजही अंगावर शहारे आणतो.
भारूड आणि गोंधळ: या लोककलांनी समाजप्रबोधनाचे कार्य केले आहे.
पैठणी: महाराष्ट्राची 'पैठणी' साडी ही जगभरात प्रसिद्ध आहे.
वेशभूषा
पुरुषांचा पेहराव: धोतर, सदरा आणि डोक्याला फेटा किंवा गांधी टोपी.
महिलांचा पेहराव: नऊवारी साडी (कासोटा) आणि नाकात नथ हे महाराष्ट्रीयन स्त्रियांच्या सौंदर्याचे लक्षण मानले जाते. 'पैठणी' साडीला तर साड्यांची राणी म्हटले जाते.
महाराष्ट्र ही केवळ एक भूमी नसून ती एक जिवंत परंपरा आहे, जिथे आधुनिकता आणि परंपरा यांचा सुंदर मेळ पाहायला मिळतो.
Edited By- Dhanashri Naik